आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून मुंबईतून सुरू होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएल मॅचवर दहशतवादाचं सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दहशताद्यांकडून वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॉटेल परिसराची रेकी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात होती. एटीएसच्या चौकशीत अटकेतील दहशतवाद्याने ही कबुली दिल्याचे म्हणत मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. असे म्हटल जात होते. तसेच आयपीएल सामन्यांच्या स्टेडियममध्ये आणि खेळाडूंच्या हॉटेल्सना सुरक्षा पुरवण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. पण यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएल सामान्यादरम्यान मैदाने, हॉटेल्स आणि त्या मार्गावर पुरेसा बंदोबस्त तैनात केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
मात्र दहशतवाद्यांनी आयपीएल क्रिकेट सामान्यांच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम, हॉटेल्स आणि त्या मार्गाची रेकी केल्याची कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावर मुंबई पोलिसांनी म्हटले की, आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत असते. पण दहशतवाद्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम आणि त्या मार्गाची रेकी केल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून माहिती प्राप्त झालेली नाही,” असे स्पष्टपणे सांगितले आहे.
पण खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस खेळाडू, इतर कर्मचाऱ्यांना आणि संपूर्ण परिसरात पुरेशी पोलीस बंदोबस्त तैनात करत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आयपीएल सुरक्षेच्या कारणास्तव यंदा शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष टीमला तैनात केले जाणार आहेत.
दहशतवाद्यांनी रेकी केल्याची मिळाली होती माहिती
मुंबई पोलिसांच्या एक इंटरनल नोटमध्ये मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना काही सुचना देण्यात आल्याचे सांगितले जात होते. या नोटमध्ये एटीएसच्या तपासादरम्यान दहशतवाद्यांनी कबुली दिली की, आयपीएलच्या दृष्टीने महत्त्वाचे खेळाडू राहत असलेल्या हॉटेलची, वानखेडे स्टेटियमची आणि तेथील रस्त्यांची रेकी केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त लावावा, तसेच खेळाडू थांबलेल्या हॉटेलबाहेर मोठा पोलीस फाटा तैनात करावा, याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या टीम देखील तैनात कराव्यात. असे म्हटल्याचे समोर आले होते. तसेच मॅचच्या दरम्यान हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आल्याचेही सांगितले जात होते.
यंदा आयपीएल स्पर्धेत एकूण 10 टीम खेळणार आहेत. या टीममध्ये लीग स्टेजमधील 70 मॅच या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहेत. त्यामुळे भारतसह परदेशातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. परंतु या स्पर्धकांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही चुक होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून योग्यती खबरदारी घेतली जात आहे.












