आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना मदतीची घोषणा केली असून त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाममधील कछार आणि त्याच्या शेजारील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आसाममधील 32 जिल्ह्यांमध्ये 45 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. कचार जिल्ह्यातील सिलचर शहरासारखे अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. त्याचवेळी आसाममध्ये या वर्षी एप्रिलपासून पूर आणि भूस्खलनात १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप करत एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार स्थापण्याची विनंती त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.यानंतर शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेतील अनेक दिग्गज नेते आणि आमदारांनी गुवाहाटी गाठलं. आसाममधील भीषण पूरस्थिती आणि तिथं हॉटेलमध्ये थांबलेल्या या शिवसेना आमदारांवर टीका देखील झाली. तिथल्या काही स्थानिकांनी याविरोधात निदर्शनं देखील केली होती.
आज हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघणार आहेत. सगळे आमदार बाराच्या सुमारास कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून दर्शन केल्यानंतर तीनच्या सुमारास गुवाहाटी विमानतळावर पोहोचणार आहेत. तिथून ते गोव्याला पोहोचणार असल्याची माहिती आहे. याआधी शिंदे यांनी आसाममधील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे












