मनमाड : (योगेश म्हस्के)दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह गणेशभक्तांमध्ये काही वेगळाच दिसुन आला , घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येत होता. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांच्या वतीने भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.

शहरामध्ये काल विसर्जन सोहळ्या प्रसंगी जोरदार मुसळधार पावसाचे देखील आगमन झाले होते , परंतु या पावसामध्ये देखील अनेक नागरिकांनी आपल्या बाप्पाचे अत्यंत मनोभावे विसर्जन पार पाडले. सकाळी मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि वेशीतील मानाचा गणपती श्री निलमणी गणेशाची पारंपरिक पद्धतीच्या मिरवणूकने विसर्जन सोहळा संपन्न झाला. शहरातील अनेक मानाची गणेश मंडळे , घरगुती गणपती यांचे मध्यरात्री पर्यंत गणेशकुंड येथे विसर्जन संपन्न झाले.

यंदाच्या वर्षीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सर्वात आगळी-वेगळी विसर्जन मिरवणूक ठरली ती गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या ‘गोदावरीचा राजा’ गणपतीची , गेल्या 26 वर्षांपासून मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडुन कदाचित देशातील एकमेव असणारा चालत्या प्रवासी रेल्वेगाडी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पुर्ण झाल्याने मिरवणुकीमध्ये या मंडळाच्या वतीने 75 मीटरलांब ध्वज तयार करून मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळाच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा व डोक्यावर फेटे परिधान करून बाप्पांच्या पुढे ध्वज हातामध्ये धरून , डी.जे.वर वाजणारे देशभक्तीपर गीत आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढुन मनमाडकरांची मने जिंकली.













