मनमाड : ( योगेश म्हस्के)आज कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते , या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.
कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.पंढरपूरला या एकादशीला मोठी यात्रा भरत असते.
मनमाड शहरातील श्री बालाजी विठ्ठल मंदिर(नाईकांचे) , वेशीतील विठ्ठल मंदिर , बुधलवाडी येथील माऊली मंदिर ,श्री गजानन महाराज मंदिर येथे गेल्या कोजागिरी पौर्णिमेपासुन दररोज पहाटे काकडा भजनाचे आयोजन करण्यात आले आहे , पहाटे पाच वाजल्या पासुन मंदिरामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत असुन परीसरातील वातावरण भक्तिमय होत आहे.आज कार्तिकी एकादशी निमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली असुन अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजचा दिवस पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.