दशकांपासून मनमाड शहराला भेडसावणारा आणि प्रत्येक निवडणुकीत प्रमुख मुद्दा असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी हद्दपार व्हावा, यासाठी आलेली करंजवन पाणीपुरवठा योजना शहराला नवसंजीवनी देणारी आहे. सदर योजना अंतिम टप्यात असून योजनेचे टेंडर निघणार आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी, विरोधपक्ष, शहरातील विविध पक्ष, संघटना, पत्रकार, पालिकेचे सर्व नगरसेवक, एमजीपीचे अधिकारी, कर्मचारी सर्वांचेच यश असल्याचे प्रतिपादन धात्रक यांनी केले आहे.
शहराचा लोकसंख्येचा वाढता आलेख पाहता वागदर्डी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांनी आंदोलने केली विविध योजना सरकार दरबारी मांडल्या. मनमाड बचाव कृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणेकामी योग्य योजनेचा प्रस्ताव एमजीपीला सुचविण्यात आला. त्यानुसार करंजवन पाणीपुरवठा योजना पुढे आली आणि सोमवारी टेंडर निघणार आहे. योजनेसाठी तत्कालीन नगराध्यक्षा सौ. पद्मावतीताई धात्रक यांनी विशेष प्रयत्न केले. माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांचेकडे शिष्टमंडळासह योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करीत त्यांनी योजनेला चालना देत मंजुरीकामी सर्व हायड्रोलिक डिझाईन पालिकेने एमजीपीकडे सादर केली. करंजवण येथील पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले. योजनेच्या टेक्निकल मंजुरीसाठीची सरकारी फी रु.३ कोटी माजी नगराध्यक्षा सौ.धात्रक यांनी रक्कमेचे १० हफ्ते करून भरले. योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा करण्यासाठी पालिकेचे फिल्टर हाऊस व पाण्याच्या टाक्या सुधारण्यासाठी प्रस्तावित जागा पालिकेमार्फत खरेदी करण्यात आली, त्यामुळे योजना मंजुरीचा मार्ग सुकर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आघाडी सरकारच्या काळात योजनेसाठी एक्सलेशन क्लॉज लागू करण्यात आल्यामुळे अंतिमतः टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा होऊन सदर योजनेचे टेंडर काढण्यात येणार आहे.
सर्वांनी सहकार्य केल्याने योजना अंतिम टप्प्यात…
करंजवण पाईपलाईन योजना पुर्णत्वास नेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार, आ.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी, जनहित याचिकाकर्ते मनमाड बचाव कृती समिती, वेळोवेळी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढणारे कार्यकर्ते, सर्व पत्रकार, डॉक्टर, वकिल, पालिकेचे सर्व नगरसेवक, सामाजीक
संघटना आदींच्या सहकार्य पाठींब्यामुळे करंजवन पाणीपुरवठा योजना शेवटी मार्गी लागली आहे.