लासलगाव – समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अतिशय महत्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिती,मुस्लिम फाऊंडेशन लासलगाव व नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवविवाहित दाम्पत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसुमताई होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, ज्येष्ठ नेते अशोक होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, तालुकाध्यक्ष मनीषा वाघ, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी, बबन शिंदे, समितीचे जिल्हाध्यक्ष सादिक पठाण, नाशिक शहराध्यक्ष हनीफ बशीर,समितीचे समन्वयक तथा लासलगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अफजल शेख, हाजी बिसमिल्ला शहा, डॉ.मुज्जमिल मणियार अल्ताफ शहा, निसार शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संस्थेने सामूहिक विवाह सोहळ्याचे उचलेल हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. सामूहिक सोहळ्याने आयोजन ही काळाची गरज आहे. यामुळे विवाहाच्या खर्चातील बचत होऊन हा निधी नवदाम्पत्याला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उपयोगी पडेल. तसेच गोर गरीब कुटुंबीयांना या सोहळ्यातून अधिक मदत होते असे त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, फातिमा बी शेख यांचा आदर्श मुलींनी ठेवावा. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना साथ देऊन महिलांना शिक्षण दिलं. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे असे सांगत समाजातील एकात्मतेाठी तसेच चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी असे सोहळे होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसार उपयोगी साहित्यही यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आले.