५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवत निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरांकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी काढले.


कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली. महाड चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या वेळीही निरंकारी मिशनचे कार्यकर्ते मंडळी अखंड सेवेत अग्रेसर होते. ठाणे मतदारसंघात देखील निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दलही निरांकरी मिशनचे कौतुक केले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.












