जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या मनमाड शहरात सध्या सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराचा चार्ज प्रभारीवर असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसल्याचा आरोप करत सक्षम पोलीस निरीक्षक नेमावा या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
मनमाड पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनमाड हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि चार तालुक्याचे प्रवेशद्वार असून अतिशय संवेदनशील शहर आहे. एफसीआय, इंधन कंपन्या, रेल्वे कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, जंक्शन रेल्वे स्थानक असल्याने शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दुचाकी चोरी, चैन स्नाचींग, छेडछाड, लुटमार तसेच खुनासारखे गंभीर गुन्हे होतात. काही वर्षांपूर्वी बाहेरगावच्या टोळक्याने गैंगवार करुन एकाचा खून केला होता. काही महिन्यापूर्वी एका आदिवासी लहान बालकाचा खुन झाल्याचे उघडकीस आले होते. आजपर्यंत शेकडो मोटारसायकल चोरी गेल्या आहेत. दररोज मोटारसायकली चोरीला जात आहे. त्याचा तपास लागलेला नाही. दीड लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या या शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांना व गुन्हेगारांना नियंत्रित करण्याचे काम शहर पोलीस ठाण्याचे आहे. मात्र येथे सक्षम अधिकारी नसल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पोलीस प्रशासनाला अशक्य झाले आहे. मागील दोन तीन वर्षांपासून पोलीस निरिक्षक पद रिक्त आहे. प्रभारीकडे चार्ज आहे. सक्षम अधिकारी नसल्याने पोलीस प्रशासन निष्क्रिय झाले आहे. १२० असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या घटून ४० वर आली आहे. कमी पोलीस संख्या वाढत्या गुन्हेगारीचे एक महत्त्वाचे कारण असून नागरिकांच्या तक्रारी दाखल केल्या जात नसल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सक्षम अधिकारी असलेला पोलीस निरीक्षक नेमण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शहरप्रमुख माधव शेलार, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, विधानसभा संघटक संतोष जगताप यांनी केली आहे.














