शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे व महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज मार्केट समितीच्या गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एक शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कांदा खरेदी-विक्रीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती महत्त्वाची बाजारपेठ असून, येथे विक्रीस येणाऱ्या एकूण आवकपैकी ८० ते ९० टक्के आवक ही कांद्याची होत असते. यावर्षी नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह गुजरात. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत आहे. तसेच केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस कांदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्याने केंद्र व राज्य शासनाच्या ध्येयधोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या प्राथमिक बाजारपेठ असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणाऱ्या कांदा आवकेपैकी ६० ते ७० टक्के कांदा निर्यातयोग्य असतो. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही.
कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्याला प्रति एकरी ८० हजार रुपये खर्च येतो मात्र कांदा पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा किमान खर्चही मिळत नाही. कांदा पिकाला मिळणारा बाजारभाव व होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हितार्थ तसेच कांदा पीकाला रु. २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा व केंद्रसरकारने कांदा निर्यात सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना माजी आमदार राजेंद्र देशमुख, संजय पवार, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, संतोष बळीद, संतोष गुप्ता, माधव शेलार,दीपक गोगड, नाझिम शेख, सनी फसाटे, लियाकत शेख, भैया घुगे, यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


















