कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार आहेत. यासाठी सहा संघांची निवड करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जय भवानी व्यायाम शाळेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह सतीश सूर्यवंशी, सदस्य वाल्मिक बागुल, पंच प्रमुख राजेंद्र निकुंभ, सुधाकर कातकडे, रमेश केदारे उपस्थित होते. यावर्षी पंकज खताळ यांच्या सहकार्याने आजी-माजी खेळाडू व नाशिक जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन येत्या २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलावर सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. एकाच मैदानावर दररोज फक्त तीन सामने खेळविले जाणार आहेत. दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यात सहा संघ आणि सहा प्रशिक्षक आहेत. एकूण ९८ खेळाडूंमध्ये १९ सामने सात दिवस होणार आहेत. या लीग स्पर्धेसाठी २१-२१ दिवसांची दोन शिबिरे घेऊन त्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळण्याच्या जागेनुसार व कौशल्यानुसार या खेळाडूंची सहा संघांत विभागणी करण्यात आली. सर्व संघ तुल्यबळ व्हावेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
पापा थॉमस, जयकुमार फुलवानी, अरबाज काजी, सागर गरूड, विजय बेदाडे व प्रमोद गांगुर्डे, बाळा सांगळे हे सहा संघमालक आहेत. या स्पर्धेसाठी १५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, ११ हजारांचे दुसरे बक्षीस आकाश वाघमारे, ७ हजारांचे तिसरे बक्षीस अन्वर पठाण, तर ५ हजारांचे चौथे बक्षीस लियाकत शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
प्रत्येक सामन्यातील सामनावीराला वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी आयोजन प्रमुख रमेश केदारे, बंटी सोनवणे, भूषण दरगुडे, प्रसाद दरगुडे, आयण शेख, समीर शेख, मयूर बनसोडे, निर्माण मोरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.












