महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील नियोजीत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आता थेट उन्हाळी सुट्टीनंतर जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याचे म्हटले जात आहे. अशातच पुढे न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या आहेत, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची सुनावणी थेट जुलै महिन्यातच होण्याची शक्यता वर्तवण्याच येत आहे. दरम्यान, 20 मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणी तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. अशातच आज होणारी सुनावणीही लांबणीवर पडली असून आता पुढची सुनावणी कधी? याची उत्सुकता आहे.
ऑगस्ट 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. कारणंही तसंच आहे.या एका याचिकेवर 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यातील तारीख दिली होती. पण त्यादिवशीही सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणीसाठी 4 मे ही तारीख दिली होती. परंतु, आजही कोर्टाच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता निवडणुका पावसानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.