मनमाड : आषाढी-कार्तिकी वारी निमित्त चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांचा मेळा भरत असतो , दरवर्षी पंढरीची वारी ही समस्त वारकऱ्यांसाठी एक मोठी पर्वणी असते , वारी म्हणजे शुद्ध भक्तीभाव , वारी म्हणजे एकात्मतेचे दर्शन आणि सर्व समाजाला एकरूप करणारी म्हणजे पंढरीची वारी होय.
आषाढी निमित्त पंढरीमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा भरत असतो , मनमाड शहरामध्ये देखील दरवर्षी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा सोहळा अनेक विठ्ठल मंदिरांमध्ये साजरा करण्यात येत असतो , यंदाच्या वर्षी देखील आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
शहरातील पुरातन असलेल्या श्री बालाजी विठ्ठल मंदिर , वेशीतील श्री विठ्ठल मंदिर , दत्त मंदिर येथील श्री संत सावता माळी मंदिर , बुधलवाडी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे पहाटे श्री विठ्ठल-रखुमाई मुर्तीला अभिषेक पुजन , दुपारी भजन , सायंकाळी नगरप्रदक्षिणा , हरिपाठ , महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आषाढी एकादशी निमित्ताने या मंदिरांमध्ये करण्यात आले होते. श्री विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली असुन , या सर्व कार्यक्रमांना शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























