नांदगाव सोमनाथ घोंगाणे
गिरणा धरणावरील नागरिकांना पायी जाण्यासाठी असलेली पायवाट रस्ता तब्बल एका वर्षापासून बंद केला असल्याने हजारो मच्छीमार बांधवांसह नांदगाव तहसील कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले..
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गिरणा धरण निर्मिती होऊन ५० ते ६० वर्षाच्या कालावधीत कधीही पायी जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद करण्यात आला नव्हता. मात्र प्रशासनातर्फे तब्बल एका वर्षापासून सदरचा रस्ता बंद केल्याने स्थानिक मच्छिमार करणाऱ्या बेरोजगार तरुणासह ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गिरणा धरणावरील सदर रस्ता बंद असल्यामुळे स्थानिक मच्छिमार करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता बंद असल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार अभावी उपाशीपोटी राहण्याची वेळ आली असल्या चे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पायवाट रस्ता अभावी स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदरचा रस्ता येत्या सात दिवसात खुला करावा अन्यथा धडक लोकशाही मोर्चातर्फे धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल,तसेच आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकी वर गिरणा धरण परिसरातील मच्छीमारी करणाऱ्या नागरिक व स्थानिक रहिवाशांतर्फे बहिष्कार टाकण्यात येईल असेही निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे .यावेळी शेखर पगार, तेजस जावरे, रवींद्र आहेर, सोनू दळवी, सागर सौंदाणे, दिपक भोई, वाल्मीक जावरे, रवी पवार, इम्रान खाटीक, आप्पा भोई, भास्कर दळवी, दादा गायकवाड, नाना निकम आदी मच्छीमारासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












