मनमाड : योगेश म्हस्के – गेल्या 28 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याखानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेस शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुकर व्हावी या हेतुने 5 वी ते 10 विच्या मनमाड मधील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध विषयांच्या स्पर्धेचे आयोजन रविवार छत्रे हायस्कुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भावगीत आणि देशभक्ती गीत , 6 वी हस्ताक्षर , 7 वी चित्रकला , 8 वी प्रश्नमंजुषा , 9 वी निबंध , 10 वी सामान्यज्ञान स्पर्धांचे विविध विषय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले होते. शहरातील विविध शाळेतील एकुण 430 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन या शालेय स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये संख्यात्मक सहभाग जास्त असणाऱ्या शाळेला सन्मान चिन्ह देऊन आणि यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.













