मनमाड शहराला पाणी पुरवठा करणेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार कांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
पत्राचा आशय असा नांदगांव मतदार संघातील मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण व परिसरात नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यमान होत नसल्यामुळे मनमाड शहराचा पाणी पुरवठा हा नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यात दर वर्षी सुमारे ३५५ द.ल.घ.फुट बिगरसिंचन पाण्याचे कायम स्वरूपी आरक्षण असलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. यापूर्वी देखील डाव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या बिगरसिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून मनमाड शहराला २० ते २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वागदर्डी धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतेकाच पाणी साठा असल्याने शहराला पाणी टंचाई निर्माण होवू नये याकरिता वागदर्डी धरणात आवर्तन ‘सोडण्यासाठी मा. कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांना पत्र क्र. १७९९/२०२३ दि. २१/०७/२०२३ आणि जा.क्र.१८८९/ २०२३ दि. ३१/०७/२०२३ द्वारे कळविण्यात आले आहे. परंतु बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी माहे ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याचे संकेत मिळत असल्याने मनमाड शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित केलेले बिगरसिंचन पाण्याचे आवर्तनाचे पाणी लवकरात लवकर सोडण्यासाठी संबंधितांना आदेश करण्यात यावे अशी विनंती आमदार कांदे यांनी केली आहे.












