मनमाड शहरावर उदभवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले असून पाटोदा येथील साठवण तलावात पाणी घेतले जाणार आहे. धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. आवर्तनाचे पाणी सुटल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. हे पाणी वागदर्डी धरणात पोहचल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होणार आहे.
मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. परिसरात चांगला पाऊस झाला नसल्यामुळे धरण भरू शकले नाही. त्यामुळे साठा संपुष्टात आल्याने पाण्याने तळ गाठला होता. मृत साठाच शिल्लक असल्याने आहे त्या पाण्यात पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या शहराला २० ते २२ दिवसाआड अर्थात महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओढवले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. तरी दमदार पाऊस झाला नाही. आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणात पाणी नसल्याने शहराला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता. पालखेड धरणात आरक्षित असलेल्या पाण्याच्या आवर्तनची अत्यंत गरज होती. पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिले तसेच आमदार सुहास कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी आज पोचले असून पुढे येवल्यासाठी ते सोडण्यात आले आहे. उद्या सकाळनंतर ते पाटोदा येथील साठवण तलावात घेतले जाणार आहे. पाटोदा येथील साठवण तलावात तीन दिवसात या अवर्तनाचे पाणी १५ एमसीएफटी मिळणार आहे. तेथून ते वागदर्डी धरणात पंपिंग केल्यानंतर त्याचा शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र वागदर्डी धरणाची क्षमता ११० एमसीएफटी असल्यामुळे पाण्याचे नियोजन करणे मोठ्या अडचणीचे ठरणार आहे. हे पाणी २ महिने पुरण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे असणार असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दमदार पाऊस झाल्यास पाणीसंकट जाणवणार नाही. मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल, पाणीपुरवठा अधिकारी अमृत काजवे यांनी पाटोदा साठवण तलावावर भेट देऊन पहाणी केली तेथील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.













