मनमाड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकात देशभक्ती जागृत व्हावी, या हेतूने ‘मेरी माटी, मेरा देश’ हे राष्ट्रीय अभियान सर्वदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राबविले जात आहे. त्यानुसार मनमाड शहरातही नगर परिषदेतर्फे हे अभियान राबविले जात आहे.
कवी रबिन्द्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी संचलित कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कुल व ज्यु. कॉलेजच्यावतीने या अभियानांतर्गत नुकतेच अमृत कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी सहभाग घेतला. या रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक व्यवहारे, शाळेचे विश्वस्त श्री धनंजय निंभोरकर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी तसेच शिक्षक श्री विशाल झाल्टे, श्री प्रवीण आहेर, विलास कैचे, शहनाज पठाण आणि सौ. गौरी जोशी यांनी सहभाग घेतला.
या रॅलीमध्ये मेरी मिट्टी मेरा देश व मिट्टी को नमन वीरो को वंदन या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सिद्धिविनायक नगर, पल्लवी मंगल कार्यालय परिसर, फुले चौक, चिंतामणी मंगल कार्यालय, रविकिरण अपार्टमेंट, शिवाजीनगर नंबर दोन, वसंत हाउसिंग सोसायटी या परिसरात मेरी या कार्यक्रमांतर्गत घराघरातून माती व तांदुळ गोळा करण्यात आले. यावेळी ‘मेरी माटी, मेरा देश’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. परिसरातील नागरिकांनीसुद्धा अमृत कलशात माती टाकून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांचे मार्गदर्शन तर श्री. राजेश सोनवणे, सौ. स्वाती बिडवे आणि सौ. वैशाली रसाळ यांचे सहकार्य लाभले.














