मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. दरम्यान, अखेर बळीराजाची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. तर, पेरणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आणि पेरणीला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीतही वाढ झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा तुटवडा जाणवू नये. तसेच वाढीव दराने कुणीही बियाण्यांची विक्री करू नये. यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात काही विभागात चढ्या दराने बियाणे विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका वाणांचे रेट हे सर्वत्र एकच असावेत व ज्या त्या कंपन्यांनी आपापले दर प्रसिद्ध करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या
यावर मंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांना यावेळी त्यांनी केल्या आहेत. तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या पथकाने सक्रिय होत कुठे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल. तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार आहे.