मनमाड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध खंजिरी वादक आणि गायिका मीरा उमप यांनी आंबेडकरी गीतांची सुरेल मैफल सादर करत उपस्थित रसिकांची मनं जिंकली.
कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचे प्रतिबिंब असलेली गीते त्यांनी आपल्या खास शैलीत सादर केली. “उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे”, “तुझ्या रक्तामधला भीम पाहिजे”, “राजा राणीच्या जोडीला” , व्हीआयपी” अशी अनेक गीते प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात ऐकली. टाळ्यांचा कडकडाट आणि ‘जय भीम’ च्या घोषणा यामुळे वातावरण भारावून गेलं. त्यांच्या गाण्यांमधून सामाजिक संदेश, समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्व प्रभावीपणे सांगण्यात आले.
मीरा उमप यांनी आपल्या खंजिरीच्या ठेक्यावर गीतांना वेगळंच लयबद्ध रूप दिलं. त्यांच्या आवाजातील ताकद, गाण्यांमधील आशय आणि सामाजिक भान यामुळे कार्यक्रम फक्त एक सांस्कृतिक सादरीकरण न राहता, समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम ठरला.प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाचं स्वागत केलं.
भीमोत्सव आयोजन समितीचे राजेंद्र पगारे, अमोल खरे, अनिल निरभवणे, संजय कटारे, दिनकर धिवर, निलेश वाघ, रामदास पगारे, संतोष आहिरे, सुरेश आहिरे, एम डी पगारे, विलास आहिरे, रवी निकम, डॉली निकाळे, विक्की सुरवसे, नरेन संसारे, पापा थॉमस, नाना जाधव, महेंद्र गरुड, पुष्पा मतकर, अशोक पाईक, विरेंद्र उबाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवतींसह महिलांचाही कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. समाजात समता, न्याय आणि बंधुता यांचा विचार रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे मोठे योगदान असते, अशा प्रकारचे कार्यक्रम समाजप्रबोधनासाठी आणि आंबेडकरी विचारांची पिढ्यानपिढ्या जपणूक होण्यासाठी महत्वाचे ठरतात, असे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
फोटो
मनमाड : आंबेडकरी गीते सादर करतांना खंजिरी वादक मीरा उमप आणि ग्रुप