
मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान बाजार समितीचे सचिव श्री. बळीराम लक्ष्मणराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना बाजार समितीची रचना, कार्यपद्धती, आर्थिक अहवाल तयार करण्याची पद्धत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रशासन व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी तसेच हमाल-मापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था असून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मालाची योग्य मोजणी, पारदर्शक लिलाव प्रक्रिया, साठवण सुविधा व स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले जाते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मनमाड व नांदगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी आपले कृषी उत्पादन विक्रीसाठी या बाजार समितीत आणत असल्यामुळे परिसरातील शेती अर्थव्यवस्थेत या समितीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना बाजार समितीची प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे सहकार क्षेत्र, बाजार व्यवस्थापन आणि कृषी अर्थव्यवस्था याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाले.
या या अभ्यास भेटीसाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.प्रमोद जी. आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाणिज्य विभाग प्रमुख एस. जे. सुखदेवे, डॉ. आरती एस. छाजेड व प्रा. वसंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीत सहभाग नोंदविला.











