फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या उत्साहात आणि विविध टप्प्यांमध्ये साजरे करण्यात येत आहे. हे अभियान १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले असून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून तो २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे.
या कालावधीत कार्यालयामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कर्मचार्यांमध्ये स्वच्छतेची सवय व आरोग्यविषयक जाणीव वाढविण्यासाठी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य लेखन आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
एफसीआयच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी मनमाड शहरातील सरकारी दवाखाना व सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले व साफ सफाई केली. कार्यालयीन आवारात नियमित स्वच्छता मोहीम राबवून कार्यालय परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
या निमित्ताने विभागीय व्यवस्थापकांनी श्री. जगदीश सिंघ मार्तोलिया यांनी सांगितले की, “स्वच्छता ही फक्त एक कृती नसून ती एक सवय आणि जबाबदारी आहे. ‘स्वच्छता अभियान 5.0’ च्या माध्यमातून आम्ही ही भावना प्रत्येक कर्मचार्यामध्ये रुजवू इच्छितो आणि समाजालाही प्रेरित करू इच्छितो.”
‘स्वच्छ भारत – हरित भारत’ या संकल्पनेला पुढे नेत एफसीआय मनमाडने समाजातील स्वच्छता आणि आरोग्याविषयी सकारात्मक संदेश देण्याचे कार्य हाती घेतले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस या अभियानाचा समारोप कार्यक्रम होणार असून, मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलेल्या कर्मचार्यांचा गौरव करण्यात येईल.