मनमाड – शहरात वीज मंडळाच्या वतीने आरेरावी पद्धतीने सुरू असलेल्या थकबाकी वसुली मोहिमेबाबत शिवसेना मनमाड शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मयूर बोरसे यांनी कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मनमाड विभाग यांना निवेदन देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील अनेक वीज ग्राहकांकडून तक्रारी शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे येत आहेत. अनेक ग्राहक थकीत रकमेपैकी 50% ते 70% रक्कम तातडीने भरण्याची तयारी दाखवत असतानाही वीज मंडळाचे अधिकारी पूर्ण रक्कम जागेवरच भरण्याचा आग्रह धरीत वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनमाड हे कामगार वस्तीचे शहर असून अनेक ग्राहकांनी बिलांबाबत दिलेल्या लेखी तक्रारी निकाली न निघताच त्यांना ‘संपूर्ण बिल भरा अन्यथा वीजपुरवठा तोडू’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
* मागण्या :
1. ज्यांच्या तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांचे शंका निरसन होईपर्यंत वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात यावेत.
2. जास्त थकबाकी असल्यास रक्कम दोन हप्त्यांत भरण्याची परवानगी द्यावी.
3. चुकीच्या बिलांवरील तक्रारी तत्काळ मार्गी लावाव्यात.
4. कारवाईपूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना अथवा नोटीस देण्यात यावी.
5. वसुली करताना मानवी दृष्टिकोन ठेवून अरेरावीची भाषा टाळावी.
या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेना मनमाड शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी दिला आहे.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक नाना शिंदे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, दिनेश घुगे, प्रमोद अहिरे, सागर आव्हाड, गौरव थोरात, सिद्धार्थ छाजेड, देवेंद्र घाठे, सागर छाजेड, करण बहोत, निलेश व्यवहारे उपस्थित होते.












