
मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरूवात सर्व संस्थापक-विश्वस्तांच्या हस्ते सरस्वती आणि रबिंद्रनाथ टागोरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कु. अमिता झाडे यांनी संस्थेच्या मागील २३ वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीचा आणि वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिका-यांनी संस्था आणि शाळेच्या स्थापनेसाठी केलेल्या कार्यातील योगदानाचे महत्व विषद करतांना त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले. यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते सर्व संस्था पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला व ‘बोर्ड ऑफ ट्रस्टी’ या फलकाचे उद्घाटन अध्यक्ष श्री. मुकेश मिसर व संस्थाचालकांच्या हस्ते करण्यात आले.
संस्था वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात इ. ६ वीची विद्यार्थिनी कु. श्रेया लहामगे हिने ‘आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा’ हे गीत सादर केले. केजी विभागाच्या चिमुकल्या बोधिका संसारे हिने भाषणातून आपले विचार मांडले. इ.६ वीच्या कु. समिक्षा आव्हाड या विद्यार्थिनीने आपल्या भाषणात ‘एकमेका साहय करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे संस्था व शाळेने प्रगती केल्याचे सांगितले. तसेच प्रवास म्हंटले की, अडथळे आलेच, पण सर्व अडथळयांना पार करून शाळेची अत्याधुनिक आणि सुसज्ज यंत्रणा उभारण्यामागे सर्व विश्वस्तांचा किती संघर्ष दडलेला आहे, तो आपण विसरता कामा नये व प्रत्येक विद्यार्थ्यांने आयुष्यात गुणवत्ता साकारून ही परतफेड करावी असे आवाहन केले.
शाळेचा ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांनी सादर केलेल्या समुहनृत्यातील ‘जीना यहाँ, मरना यहां’ या गीतातून शाळेबद्दलची आस्था आणि निष्ठा व्यक्त करतांनाच गेल्या काही वर्षात संस्था आणि शाळेच्या परिवारातील ज्या सदस्यांना काळाने हिरावून नेले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यामुळे क्षणभर उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत पुढील वाटचाल करणे हेच आयुष्याचे खरे सूत्र असल्याचे ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हया गीतातून व्यक्त केले.
शाळेतील शिक्षक श्री. सचिन बिडवे यांनी ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे भावगीत सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. सौ. अनिता शाकाव्दिपी यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून आई, मुलगी यांच्यातील विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत शाळेची भुमिका आणि विद्यार्थ्यांसह पालकांची जबाबदारी याबाबत एकमेकींशी होणारा संवाद आणि भावना व्यक्त केल्या तर सौ. संगिता कदम-देसले यांनी कवी श्याम यांची ‘झाड होणं सोप्पं नसतं’ ही कविता सादर केली. सौ. एस्तेर क्षिरसागर यांनी वेळोवेळी आलेल्या अडीअडचणीतून संस्थेने काढलेले मार्ग, उपाययोजना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ठेवलेली सहकार्याची भावना याबद्दल आपल्या मनोगतातून आभार मानले.
इयत्ता ७ वी च्या विद्यार्थिनींनी ‘किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार’ या नृत्यावर संस्था व शाळेचे कार्य समूहनृत्यातून सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. पियूष सपकाळे याने रबिंद्रनाथ टागोर यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र आपल्या रांगोळीतून साकारून उपस्थितांना स्तंभित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकेश मिसर यांनी संस्थेच्या २३ वर्षाच्या प्रवासातील चढ-उतार यांचा सुरेख आलेख मांडतांना सर्व विश्वस्तांनी त्यांच्या नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासामुळेच वाटचाल करणे सोपे झाल्याचे सांगितले. संस्थेच्या आणि शाळेच्या या यशामध्ये सर्व संस्थाचालक, शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य पालकांचा विश्वास लाभल्याचे समाधान वाटते. भविष्यातही शाळेच्या माध्यमातून दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे नमूद केले.
कार्यक्रमास संस्थेच्यावतीने श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर, श्री. ज्ञानेश्वर माळी, श्री. मनोज छाबडा आणि श्री. तुषार चौधरी हे उपस्थित होते.
समूहनृत्याचे दिग्दर्शन कु. भारती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. अमिता झाडे आणि सौ. रूपाली निंभोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे फलकलेखन श्री. राजेश सोनवणे यांनी केले.











