
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.











