
आधीच अस्मानी संकटाने होरपळलेल्या बळीराजावर आता तलाठी संपामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. तलाठ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्याने संप कायम आहे. संपामुळे महसूलचे कामकाज ठप्प पडले असून, नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवार (ता. १७)पासून सेवा पंधरवडा राबविण्यात येत असतानाच तलाठी संपावर ठाम असल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे. तलाठ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. परिणामी जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गावपातळीवर विविध दाखले, सातबारा फेरफार, पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे ठप्प झाली. परिणामी शेतकरी व जनतेचे हाल झाले असून, तलाठी कार्यालयातून रिकाम्या हाती त्यांना परतावे लागले. राज्य सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात आदिवासी वनपट्टेधारकांना सात-तीन १२-ई अंतर्गत सातबाऱ्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच जनतेची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. मात्र, पंधरवड्यावर तलाठी संपाचे सावट आहे. त्यामुळे तलाठ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.











