लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली होती त्याचाच आदर्श पुढे नेत मनमाड येथील मोरया मित्र मंडळाने एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
पतीच्या निधनानंतर विधवा माता-भगिनींना आजही समाजात अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते किंवा दुय्यम वागणूक दिली जाते. या अनिष्ट आणि जुन्या रूढी-परंपरांना फाटा देत मनमाड येथील माधव नगरच्या ‘मोरया गणेश मित्र मंडळाने’ स्त्री-सन्मानाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात विधवा माता-भगिनींच्या हस्ते श्री गणेशाची आरती व पूजा संपन्न करून त्यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले.
भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या गणेशोत्सवात मोरया गणेश मित्र मंडळाने बाप्पाच्या जयघोषासोबतच ‘महिला समानतेचा’ही नारा दिला. पतीच्या निधनानंतर आयुष्यभर समाजाच्या जाचक रूढी-परंपरांचे ओझे मनात घेऊन जगणाऱ्या या महिलांना जेव्हा गणपती बाप्पाच्या आरतीचा आणि पूजेचा मुख्य मान मिळाला, तेव्हा अनेक माता-भगिनी भावूक झाल्या. आपल्या भावनांचा आणि अस्तित्वाचा समाजाने केलेला हा सन्मान पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.
‘विधवा’ असणे हा काही स्त्रीचा अपराध नाही, त्यामुळे तिला धार्मिक कार्यातून डावलणे चुकीचे आहे, हा विचार समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष सचिन शेलार व सनी फसाटे यांच्या नेतृत्वाखाली मोरया गणेश मित्र मंडळाने हा कौतुकास्पद उपक्रम पार पाडला. या उपक्रमाचे मनमाड शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून विशेष कौतुक होत असून, समाज परिवर्तनाच्या दिशेने हे एक अत्यंत सकारात्मक आणि क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे.












