अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अकोल्यात निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा देत उमेदवार उभे केले आहेत. वाशीम जिल्ह्यात वंचित व जनविकास आघाडीची युती असून इतर पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अधिक आरक्षण होत असल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त ठरविण्यात आल्या. त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ५ ऑक्टोबरला मतदान व ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी १४ रिक्त गटांसाठी, तर अनुक्रमे २८ व २७ पंचायत समितीच्या गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. प्रचार मोहिमेला सुरुवात झाली असून नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
पोटनिवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अनेक मोठ्या नेत्यांनी आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाऊ, असे वारंवार जाहीर केले. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. त्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये उलटसुलट चर्चादेखील रंगली. अखेर काँग्रेस पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वतंत्रपणे आपले उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राज्यात सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष निवडणुका मात्र परस्परविरोधी लढत आहेत. त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेनुसार स्वबळावर पोटनिवडणूक लढण्यासाठी अकोला जिल्ह्यात काँग्रेसने सुरुवातीपासून हालचाली केल्या. काँग्रेसने १२ गटांमध्ये, तर २३ गणांमध्ये स्वतंत्रपणे आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीने आघाडी केली. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात असून, त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अकोला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. प्रमुख पक्षांना निवडक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दुसरीकडे आघाडीसंदर्भात स्थानिक स्तरावर बोलणी सुरूच होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, अंतिम क्षणापर्यंत महत्त्वाच्या काही जागावाटपाचा तिढा सुटला नाही.
अखेर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मूठमाती देत पक्षांनी स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपही स्वबळावरच निवडणूक लढत आहे.
इकडे पालघर पोटनिवडणुकीत भाजप आणि मनसे दोघांमध्ये युवी झाली असून हीच युती पुढे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पर्यंत कायम राहते का, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.












