कलाकार हे परमेश्वराने दिलेलं एक वरदान आहे पण त्याची जाणीव होणं जास्त आवश्यक असतं. आतला आवाज आपल्या कलेची जाणीव करुन देत असतो. कलेला वाव मिळवून देण्यासाठी खूप मेहनतीची गरज असते. खरा कलाकार हा प्रचंड मेहनत करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो. उत्तर प्रदेशात सध्या अशाच एका कलाकाराच्या एक्झिटने प्रेक्षकांचं मन पिळवटून गेलं आहे.
रामायणाचं सादरीकरण सुरु असताना राजा दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह याचं मंचावरच निधन झालं. श्रीराम वनवासात गेल्यानंतर पूत्र विरहाने व्याकूळ झालेल्या दशरथ राजाचा मृत्यू होतो. हाच क्षण रामायण सादरीकरणात सादर झाला. यावेळी राजा दशरथ जमिनीवर कोसळतो. त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर रंगमंचाचा पडदा खाली पडतो. त्यावेळी राजा दशरथ यांची भूमिका सादर करणारे राजेंद्र सिंह यांचा खरोखर मृत्यू झाल्याचं समोर येतं. ही घटना प्रेक्षकांमध्ये पोहोचल्यानंतर अनेक प्रेक्षक अक्षरश: टाहो फोडतात. उत्साहाच्या वातावरणाचं अचानक शोक सागरात बुडून गेले. ही अनपेक्षित घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हसनपूर गावात घडली.