कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून रेल्वेची जनरल तिकीट बंद आहे. यानंतर रेल्वे सुरळीत झाल्या असल्या तरी प्रवाशांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही.
परंतु, आता मुंबईकडे धावणाऱ्या आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम, नांदेड- मुंबई राज्यराणी आणि नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये विनाआरक्षण तिकिटाला शनिवारपासून (दि.१२) सुरुवात झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या या रेल्वेंसाठी विनाआरक्षण तिकीट या महिन्याखेर मिळण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतही यावेळी मागणी करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाचा निर्णय प्रवाशांसाठी सकारात्मक
रेल्वे प्रशासनाने तीन एक्स्प्रेसमध्ये सर्वसाधारण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचे प्रवासी स्वागत करत आहेत. प्रशासनाने आता गोदावरी एक्स्प्रेस, इगतपुरी- भुसावळ शटल आणि नाशिक- भुसावळ पॅसेंजर त्वरित सुरू करावी. – नरेंद्र खैरे











