राम…राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. ‘श्री’ हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असे अयोध्येचे श्रीराम हे राजा दशरथ व त्यांची प्रथम पत्नी कौसल्या यांचे पुत्र होते. चैत्र शुक्ल नवमीला, दुपारी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात श्रीरामाचा जन्म झाला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत.
दरवर्षी भाविक हे श्री राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. कारण, त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष ‘उत्तम’ कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला ‘मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या’ जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना ‘मर्यादा पुरूषोत्तम’ असे म्हटले जाते.
श्रीराम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. श्रीराम यांना तीन भाऊ होते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसर्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथे कधीही भांडणे होत नाहीत. श्रीरामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. श्रीराम वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत. ते नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले. तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्व दर्शवतो.
श्रीरामासारखा पती मिळावा, अशी प्रत्येक स्त्री कामना करत असते. श्रीरामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती. त्या दृष्टीकोनातून श्री रामाचा सीता त्याग आत्म बलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे , मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा, त्यासाठी महर्षी वाल्मीकी यांनी राम चरित्र लिहले. ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम!’ पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.
मनमाड शहरामध्ये यंदाच्या वर्षी प्रभु श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील आठवडे बाजार येथील पुरातन श्रीराम मंदिर , रेल्वे स्टेशन समोरील श्री राम मंदिर , श्री गजानन महाराज मंदिर , श्री रुद्र हनुमान मंदिर , दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर , गांधी चौक मित्र मंडळ आणि शहरातील या अनेक मंदिरे आणि मंडळाच्यावतीने प्रभु श्री राम जन्मोत्सवा निमित्ताने अभिषेक पुजन , दुपारी बारा वाजता जन्माचा पाळणा म्हणुन महाआरती , भाविकांसाठी महाप्रसाद आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते , सायंकाळी श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आठवडे बाजारातील प्रभु श्री राम मंदिरापासुन ते शहरातील प्रमुख मार्गाने भव्य स्वरूपातील रथ यात्रेचे अयोजन करण्यात आले होते. या वेळी या रथ यात्रेमध्ये श्री राम जन्मउत्सव समितीचे सर्व पदाधिकारी , सदस्य , श्री रामभक्त आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.












