मनमाड : सर्वांनी साथ सोडली, तरी आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, खगोलीय स्थितीतील बदलांमुळे वर्षातील काही दिवस आपली सावली देखील आपली साथ सोडते.असाच शून्य सावली दिवस मनमाडकरांनी आज अनुभवला.
तप्त उन्हात सूर्य डोक्यावर असताना आपल्याच सावलीने आपली साथ सोडल्याची अनुभूती यावेळी आली , राज्यात ३ मेपासून ते ३१ मेपर्यंत विविध जिल्ह्यांत शून्य सावली दिवस अनुभवयाला मिळत आहे. आतापर्यंत पुणे, मुंबईसारख्या ठिकाणांवर शून्य सावली दिवस अनुभवल्यानंतर गुरुवारी नाशिकसह जालना, हिंगोली, औरंगाबाद येथील नागरिकांनी हा अनुभव घेतला , आज या शुन्य सावली दिवसाचा अनुभव हा मनमाड मधील नागरिकांनी देखील घेतला.
मध्य प्रदेशातील भोपाळजवळून २३.५० अंशांवरून कर्कवृत्त गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशांच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर अशी कुठेही शून्य सावली घडत नाही. खगोलशास्त्रज्ञ यांच्या मते , इतर दिवशी सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. परंतु, वर्षातील एका दिवशी ही जागा काहीशी बदलते. परिणामी त्या एका दिवसापुरता सूर्य दुपारी बारा वाजता बरोबर डोक्यावर येऊन सावली पायाखाली येते अन् आपल्याला दररोज दिसणारी आपलीच सावली त्यावेळी गायब झाल्याचा अनुभव येतो. एरवी मोकळ्या जागेवर उन्हात उभे राहिल्यास आपल्याला सावली जमिनीवर पडलेली दिसते. परंतु शून्य सावली दिवसामुळे आज दुपारी 12 ते 12.30 पर्यंत आपली सावली आपल्या पायाच्या खाली आल्याच अनुभव अनेकांनी घेतला . अनेकांनी घराच्या छतावर आणि अंगणात उभे राहत किंवा सरळ उंचीची वस्तू उन्हात ठेवून शून्य सावलीचा अनुभव घेतला.












