शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा सुरू केल्यानंतर काल पासून ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आज सकाळी युवासेनेचे आदित्य ठाकरे यांची मनमाड येथे शिव संवाद यात्रा संपन्न झाली. ह्या यात्रेच्या विरोधात आता शिंदे गटातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आम्ही गद्दारी केली नाही. पक्षातून फुटलो नाही तर नेत्या विरोधात उठाव केला आहे. तुमचे नेतृत्व आम्हला मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत जाण्यासाठी युती केली नव्हती. आम्ही उठाव केला. त्यात, पहिला क्रमांक एकनाथ शिंदे यांचा होता तर चौथा क्रमांक माझा होता असेही कांदे यांनी म्हटले.
आमदार सुहास कांदे आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात म्हटले की, मी कोणाला उत्तर देण्यासाठी बोलत नाही. ‘मातोश्री’ बद्दल आजही आमच्या मनात तेवढाच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अपशब्द बोलणार नाही याची आम्ही शपथ घेतली असल्याचे कांदे यांनी सांगितले. आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. मात्र, त्यांच्याबाबत बोलण्यास गेलो तेव्हा मात्र उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नसल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये एकमत नव्हते असेही त्यांनी सांगितले.
आमदार सुहास कांदे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे वाघ आहेत. मात्र त्यांनी भूमिका बदलली. मटणाच्या ऐवजी डाळ भात खायला लागले असल्याचे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले. शिवसेना आता संपत चालली आहे. पक्षातून आमदार गेले. फक्त चार पाच बडवे उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.












