मनमाड – ”अवघ्या दीड दिवसाची शाळा केलेल्या खेड्यातील एका मुलाने जागतिक पातळीवरची साहित्य निर्मिती करीत मराठी साहित्याला समृद्धी प्राप्त करून देतानाच ”हि पृथ्वी शेषनागाच्या फणीवर तरंगते” ह्या बुरसटलेल्या कल्पनेला धुत्कारून ”हि पृथ्वी खऱ्या अर्थाने घाम गळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हातावर तोललेली आहे,” असा स्पष्ट पुकारा करीत आयुष्यभर कामगार-कष्टकऱ्यांच्या हक्कांचा एल्गार पुकारणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची महानता अनन्यसाधारण अशीच आहे,” असे गौरवोद्गार ख्यातनाम विचारवंत, साहित्यिक डॉ. प्रा. जे. वाय. इंगळे यांनी केले. मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव समितीच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ज्येष्ठ कामगार नेते सतीश केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डॉ. इंगळे बोलत होते.
आपल्या ओघवत्या भाषेत डॉ. इंगळे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या बालपणापासून ते शेवटर्यंतच्या वाटचालीचे एकेक पैलू उलगडून दाखवीत महत्वपूर्ण माहिती मांडून उपस्थित कार्यकर्त्यांना चकित केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना एस. सी . एस. टी. असो. चे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश केदारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कामगार चळवळीतील कार्यावर प्रकाश टाकला. ”मनमाड शहर हे कामगार वस्तीचे शहर असून आज कामगारांची अवस्था वाईटच आहे. आज तुम्ही-आम्ही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात अमृत महोत्सव साजरा करीत असूनही दारिद्रय, भूकबळी वगैरे क्षेत्रात खूपच मागे असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल एका जागतिक संघटनेने आकडेवारीनिशी दिलेली माहिती हि चिंता करायला लावणारी आहे असे सतीश केदारे यांनी यावेळी सांगितले. कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र कांबळे,अशोक परदेशी तसेच एस.एम.भाले,प्रवीण बागुल,श्रीकृष्ण पगारे यांनी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संयुक्तपणे उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले. प्रारंभी पुंडलिक कचरे, सतीश केदारे व सदस्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी रमेश चारुडे, सिद्धार्थ संसारे, आर.बी. ढेंगळे, कांतीलाल येणारे, रश्मी मोरे, शमशाद सय्यद, आशा खरे, भाग्यश्री खरे , बी.टी. पद्मने,बबिता चिंडालिया,रमेश खरे,सुरेश वाघ, रामदास पगारे, राजेंद्र दराडे,मोतीराम भालेराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. रेखा येणारे,सुषमा तिवारी,कविता मोरे,भाग्यश्री देशपांडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उपाली परदेशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.












