रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्याही व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होत आहे. देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केले आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या सुरु असणाऱ्या गृहकर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार असल्याने ग्राहकांचे बचतीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.











