मनमाड (योगेश म्हस्के): पवित्र श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सण उत्सव साजरे केले जात असतात , बहीण-भावातील अतुट नाते जपणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन होय.
श्रावण पौर्णिमेला येणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय , यालाच नारळी पौर्णिमा देखील म्हणतात. ‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्या शब्दाचेच मराठी रुपांतर होय. प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. पुर्वी ही राखी अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करत असत. हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापर करण्यात येत असत. हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. सकाळी स्नानानंतर देव, पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा, असे शास्त्र आहे. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते, अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे, हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू आहे, असे दिसते. रक्षाबंधनामुळे सर्व अशुभांचा नाश होऊन जय, सुख, पुत्र, आरोग्य, धन इत्यादींची प्राप्ती होते आणि कोणाचाही जादूटोणा, मंत्रतंत्र वगैरे चालत नाही, अशी श्रद्धा आहे. पूर्वी उत्तर भारतापुरती मर्यादित असलेली ही प्रथा आता भारतभर रूढ झाली आहे. देशातील नागरिकांनी आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या बांधण्याची आणि दूरस्थ व्यक्तींना पोस्टाने राख्या पाठविण्याची पद्धत आज देखील आढळते. या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावरील कोकण, मलबार इ. प्रदेशांतील लोक जलाची अधिष्ठात्री देवता असलेल्या वरुणाला उद्देशून समुद्रात नारळ अर्पण करतात. खवळलेला समुद्र सामान्यतः या दिवसापासून शांत होऊ लागतो . शहरातील लिटिल लॅम्बस इंटरनॅशनल स्कुल मध्ये राखी पौर्णिमा उत्सव शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला , यावेळी विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधुन बहीण-भावाचा पवित्र राखी पौर्णिमा उत्सव साजरा केला , शहरातील बाजारपेठेमध्ये राख्या खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.












