मनमाड (योगेश म्हस्के): समस्त मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी , गेल्या तीन वर्षांपासुन समस्त मनमाडच्या नागरिकांची तहान भागवणारे वागदर्डी धरण हे तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहे.
यंदाच्या वर्षीदेखील धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वागदर्डी धरण हे काठोकाठ भरले असुन काही दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होऊ शकते.गेल्या काही दिवसांपासुन मनमाड आणि परिसरात चांगला पाऊस होत आहे. मनमाडकरांच्या पाण्यासाठी आरक्षित असणाऱ्या पालखेड धरण आणि पाटोदा येथील साठवणूक तलावात देखील मुबलक पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षीदेखील मनमाडच्या नागरिकांचा पाण्याचा दुष्काळ दुर होणार आहे. आजच्या परिस्थितीत वागदर्डी धरणामध्ये 68 फुटापर्यंत पाणीसाठा असुन , धरणाच्या क्षमतेनुसार यामध्ये आता 100 दश लक्ष घन फुट पाणी साठा उपलब्ध आहे .धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी त्यामध्ये अवघे काही इंच पाणीसाठा वाढण्याची आवश्यकता आहे.












