अंकाई किल्ल्यावरील तळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. हे दोन्ही युवक नगर जिल्ह्यातील कोपरगाव धारनगावरोडचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद रविंद्र जाधव (२०) व रोहीत पिंटु राठोड (१४) रा. कोपरगाव, धारणगाव रोड असे मृत युवकांचे नाव आहे. श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. तर पर्यटनाही अनेक तरुण येथे येत असतात.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,अगस्तीमुनीच्या दर्शनाला आलेले हे दोघे युवक तळ्यात अंघोळीसाठी गेले होते. त्यातील एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बूडत असतांना दुसरा त्याला वाचविण्यासाठी गेला असता तोही पाण्यात बुडाला. यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. किल्ल्यावरील असलेल्या काही जणांना याची माहिती मिळताच त्यांनी किल्ल्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरीकांना याची माहिती दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला.अंकाई गावातील पोलीस पाटील संतोष परदेशी यांच्यासह रविंद्र अहिरे, अक्षय वैद्य, राहूल सोनवणे, राहूल अहिरे, लखन व्यापारे, शरद देवकर, पप्पू व्यापारे, नितीन सुरासे, अतुल अहिरे, सचिन जाधव, ज्ञानेशव व दिपक देवकर, सुखदेव सोनवणे,विकास देवकर, शुभम शेलार, अन्वर पठाण, रमजान सय्यद, गुडडू पठाण, श्रीराम सोनवणे या कार्यकर्त्यांनी तळ्यातून दोन्ही मृतदेह शोधण्यापासून तर त्या थेट किल्ल्यावरुन पायथ्याशी आणण्याच काम केले.












