कोरोना विषाणूच्या कारणामुळे सलग दोन वर्षा सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंधने होती. तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर पारंपारिक उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा योग मनमाड शहरातील भाविकांनी साधला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील श्रीकृष्ण मंदिरासह सर्वच मंदिरात अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णाचा जयघोष करत जन्माष्टमी साजरी करण्यात आली तर आज दहीहंडी व गोपाळकाला उत्सव साजरा होणार आहे.
पाळण्याची आकर्षक सजावट, पाना फुलांची नक्षी, विद्युत रोषणाई, चमकीच्या माळा आणि भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडवणाऱ्या प्रसंगाची सजावट असे मंगलमय वातावरण विविध मंदिरात आणि घरोघरी दिसून आले.
शहरातील वेशीतील श्रीकृष्ण मंदिर , श्रीराम मंदिर , श्री विठ्ठल बालाजी मंदिर , श्री बालाजी मंदिर , संत गजानन महाराज मंदिर , स्वामी समर्थ मंदिर , सद्गुरू श्री साईनाथ महाराज मंदिर , श्री विठ्ठल मंदिर , श्री बालाजी मंदिर, आणि रेल्वे स्टेशन समोरील श्रीकृष्ण व श्रीराम मंदिरात मध्यरात्री उशिरापर्यंत श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
या निमित्त श्रीमूर्तीस अभिषेक- पूजा होऊन, भजन व किर्तनासह श्रीमूर्तीवर पुष्पवृष्टी करीत पारंपारिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने जन्माष्टमीचा उत्साह दिसून आला. मंदिरामध्ये फुलांची सजावट, रंगीबेरंगी पताका लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती . आज शहरात विविध ठिकाणी दहींहडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.













