भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार माधवराव गायकवाड स्मृती जीवनगौरव पुरस्कार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांना घोषित झाला आहे. रविवारी अमरावतीत सुरू होणाऱ्या पक्षाच्या तीन दिवसीय राज्य अधिवेशनात पुरस्कार वितरित केला जाणार आहे
हे अधिवेशन एलआयसी भवन नजीकच्या नेमाणी इनमध्ये आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार त्यांना बहाल केला जाईल. यावेळी आयटकच्या सरचिटणीस अमरजित कौर व किसान सभेचे राष्ट्रीय नेते तथा स्वामीनाथन आयोगाचे सदस्य अतुलकुमार अंजान प्रामुख्याने उपस्थित राहतील.
माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत तर आहेच. त्यांनी प्रदिर्घ लढ्यातून खंडकरी शेतकरी यांना जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रातही ते पुढे होते. छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. नांदगाव विधानसभेचे आमदार 6 वर्ष विधान परिषेदत सदस्य, विरोधी पक्षनेते, भाकपचे 13 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अध्यक्षपद भूषविले आहे.
आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी कॉम्रेड भस्मे यांची निवड झाली आहे. रोख रक्कम 31 हजार रुपये, स्मृती चिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भस्मे यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासूनच शेतमजुरांच्या आंदोलनापासून सुरुवात केली. 1972 च्या दुष्काळात मजुरांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. सुदामकाका देशमुख यांच्यासोबत आंदोलनात सहभाग 1975 ते 1990 कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग होता.












