मनमाड : येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय (इंडियन हायस्कूलच्या) २००० मधील दहावी एसएससीच्या बॅचमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी येथे स्नेहमेळावा या शाळेत तसेच पल्लवी मंगल कार्यालयात झाला. त्यास ७० जणांची उपस्थिती होती.
तब्बल २२ वर्षानंतर हे सर्व प्रथमच एकमेकांना भेटल्याने जुन्या आठवणीत रममाण झाले. २००० मध्ये सोशल मीडियाची कोणतीही सुविधा नव्हती. त्यानंतर मोबाईलचे युग आले. दरम्यानच्या काळात या मित्रांचा प्रत्यक्ष असा कोणाशीही गेल्या कित्येक वर्षांपासून संपर्क नव्हता. परंतु त्यानंतर काही महिन्यांपासून यासर्व मित्रांनी व्हॉटस्अॅप ग्रुप स्थापन केला व शाळेतील कर्मचार्यांच्या मदतीने तत्कालिन २२ वर्षांचे रेकॉर्ड तपासून सर्व मित्राची नावे, पत्ते व मोबाईल नंबर शोधून काढले. अशा एकूण ७० शालेय मित्र -मैत्रीणींच्या उपस्थितीत अखेर मनमाड येथे हा मेळावा तत्कालिन शिक्षकांच्या उपस्थितीत व शाळेत घेण्यात आला. ज्या शाळेतून शिक्षण आणि संस्कार मिळाले त्या शाळेला प्रत्यक्ष भेट देवून या विद्यार्थ्यांनी त्या त्या वर्गात जावून बेंचवर बसण्याचा व गप्पा मारण्याचा आनंद घेतला. इंडियन हायस्कूलच्या प्राचार्य क्रांती कुंझरकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी तत्कालीन शिक्षक सदाशिव सुतार, श्री डंके सर, श्री बावा सर, श्री पाटील सर, हंडोरे मॅडम, बावा मॅडम, चंदनशिव मॅडम, किशोर पाटोदकर सर आदींनी आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या शाळेतील आठवणी व अनुभव सांगितले. जुन्या १५ वर्षे वयाच्या तत्कालिन स्मृतीमध्ये शिक्षकांसह सारे विद्यार्थी यावेळी रममाण झालेले दिसले. त्यानंतर पल्लवी मंगल कार्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांचा त्याचबरोबर आपल्या कुटुंब परिचय करून देत गतकाळातील स्मृतीना व आठवणींना उजाळा दिला. स्नेहसंमेंलन आयोजित करणार्या मनमाडच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्वांचे ढोल-ताशाच्या गजरात तसेच शॉल, सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. तब्बल २२ वर्षानंतर परस्परांना भेटल्याने सर्व मित्रांच्या चेहर्यावर आगळाच आनंद झळकला होता. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत या दोन दिवसांच्या स्नेहसमेलनाचे सोनेरी क्षण आपल्या हृदयात साठवित यासर्व मित्रांनी अखेर एकमेकांचा निरोप घेतला व या संस्मरणीय भेटीची सांगता झाली. या स्नेहसंमेलनाचे संयोजन येथील पत्रकार अमोल खरे, नरेंन संसारे, राकेश कोल्हे, प्रकाश पठाडे, सोमनाथ चव्हाण, शांताराम वाघ, उषा संसारे, श्रध्दा गोसावी, संतोष सोनवणे, आदींनी केले. तर मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, इंदौर आदी भागांतून मित्र मैत्रिणी उपस्थित होते यापुढील काळात सर्व मित्रांना गरज लागेल त्याप्रमाणे आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आदींसाठी जशी मदत लागेल तशी उपलब्ध करून देण्याचे ठरले.

फोटो
मनमाड : सन २००० च्या बॅचचे इंडियन हायस्कूलचे माजी विद्यार्थी












