यंदा दमदार पाऊस होऊनही मनमाड नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे मनमाड वासियांना २२ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आज सकाळी नगर परिषद प्रशासन विरोधात मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. या प्रसंगी मनसे तर्फे नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले .निवेदनाचा आशय असा
मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आहे. संपूर्ण मनमाड शहराला वागदर्डी धरण येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा पावसाळ्यात मनमाड शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे शहरातील सर्व नद्या नाले ओसंडून वाहत होते तसेच पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरणही ओव्हरफ्लो झाले. मात्र, धरण ओव्हरफ्लो होऊन देखील मनमाड शहरातील नागरिकांना मात्र भर पावसाळ्यात व अद्यापही 22 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे याचे मुख्य कारण मनमाड परिषदेच्या चुकीच्या पाणीपुरवठा नियोजन, मनमाड शहराला भर उन्हाळ्यात 13 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र पावसाळ्यात 22 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे याला सर्वस्वी मनमाड नगरपरिषद प्रशासन व पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे.
अंदाजे 2 लाख लोकवस्ती असलेल्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन देखील कमकुवत झाल्या आहेत. प्रत्येकवेळी पाणीपुरवठा होत असतांना कुठे ना कुठे पाईपलाईन फुटते त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. मागील काही महिन्याआधी मनमाड नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना चलन भरुन जुन्या नळ कनेक्शन च्या ऐवजी नवीन नळ कनेक्शन बदलून दिले मात्र पाणीपुरवठा 22 दिवसाआड केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मनमाड शहराला गेल्या दीड महिन्यापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपरिषदेला विचारणा केली असता शहरात सर्वत्र पाणी सोडणारे वॉलमन यांचाही नियोजनाचा अभाव असल्याचे लक्षात आले, अनेक वॉलमन हे रिटायर्ड झाले अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यानेही त्या जागी अस्थापना विभागाने नवीन कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे किंवा इतर विभागातील कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन नियुक्त करणे आवश्यक आहे. नियमित नगरपरिषदेची पाणीपट्टी भरुन देखील जनतेला 22 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मनमाड नगरपरिषद प्रशासनाने वर नमुद चुका सुधारल्याशिवाय तसेच पाणीपुरवठ्यावर सुयोग्य नियंत्रण केल्याशिवाय बदल होणे अवघड आहे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास नगरपरिषदेने तयार राहावे.
पाणी हा मनमाडच्या जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा व ज्वलंत प्रश्न आहे. सणासुदीच्या काळात जर नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागत असेल तर आता जनतेची सहनशिलता संपल्यामुळे जनता देखील पाण्याची वाट पाहता पाहता नगरपरिषदेची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. शहरातील जनतेला एकत्र घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहाराच्या रस्त्यावर उतरुन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना ऑफीसला भेट न देता भर रस्त्यावर ओढून, तोंडाला काळे फासून प्रश्न विचारण्यात येईल व त्याची उत्तरे देखील अधिकाऱ्यांना त्याच रस्त्यावर द्यावी लागतील असा इशारा संपूर्ण मनमाडकरांच्या वतीने मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी दिला आहे.

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत
मनमाड -- “स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्या तुटणं नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी आणि देशसेवेच्या...