मनमाड शहरापासून जवळच असलेल्या वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असताना केवळ तीनच शिक्षक असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेत शाळेला कुलूप ठोकले. पदानुसार शिक्षक दिले नाही तर पंचायत समितीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वंजारवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, यात सुमारे २३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र, या शाळेत शिक्षकांची सात पदे मंजूर असताना केवळ तीनच शिक्षक आहे. सदर शिक्षक आपापल्या परीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षण देतात. अनेकदा मुलांना आपण काय शिकलो, हे लक्षात राहत नाही. तर अनेकदा शिक्षकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत समक्ष भेटून समस्या मांडल्या. मात्र, कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. पहिली ते सातवीपर्यंतच्या सात वर्गांचा भार तीन शिक्षकांवर पडतो. शुक्रवारी वंजारवाडीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ व पालकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले असता संतप्त ग्रामस्थ व पालकांनी ग्रामसभेत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. तातडीने चार शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी सरपंच कांचन गायकवाड, उपसरपंच अनुराधा सावंत, सदस्य संतोष पवार, जनाबाई गुंडगळ, पंकज जाधव, मच्छिद्र जाधव, अनिल दखणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष लभडे, गोरख गुंडगळ, शरद जाधव, प्रकाश सावंत, भागीनाथ शिंदे, नथु गुंडगळ, अर्जुन गायकवाड, संजय शिंदे, पप्पू ठाकरे, ललिता पगारे, सतीश जाधव, दत्तू जाधव यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.












