मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि दिरंगाई तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षा विरोधात मराठा समाजाचे नाना आबाजी शिंदे आणि विष्णू शंकर चव्हान हे आज पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास बसले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मनमाड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे. जेव्हापासुन महाराजांचा अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे तेंव्हापासुन आजपर्यंत या पुतळयाच्या सुशोभिकरणा विषयी मनमाड नगर परिषदेमार्फत कुठेही लक्ष दिले गेलेले नाही. वा याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासुन अनेक संघटनांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत मागणी करून निवेदने दिली असुन देखील पालिकेकडुन त्यास प्रतिउत्तर म्हणुन फक्त आश्वासणेच मिळाली प्रत्यक्षात कृती झालेली नाही.
मागील शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारी २०२२ ला सांगितले गेले की येत्या चार महीन्यात महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल. यासाठी नाशिकच्या शिवभक्ताला याविषयीचे डिझाईन व आराखडा करून देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु चार महीने होऊन देखील याबाबत पालिकेतर्फे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही वा सुशोभिकरण्याच्या कामास सुरुवात केली असे दिसत नाही.
महाराजांची जयंती जवळ येत आहे तरी याबाबत प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली गेलेली नाही व आख्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या विषयी असे राजकारण होत असेल तर याच विषयाचा राग, संताप मनमाड मधील सर्व शिवभक्त यांना आहे. सर्व शिवभक्त याविषयी सुशोभिकरणाचे काय झाले असा प्रश्न करीत आहेत. परंतु पालिकेमार्फत वा लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसून शिवभक्त नाना आबाजी शिंदे व श्री विष्णु शंकर चव्हाण हे दोघेही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसले आहेत. होणाऱ्या परिणामांस मनमाड नगर पालिका जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.












