loader image
[ays_poll id=7]

वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला

Dec 13, 2022


दरेगाव -( गोरक्षनाथ लाड )गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्यासह गहू, हरभरा व इतर पिकांची लागवड केली आहे. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर औषधांची फवारणी केल्याने कांदा पिकात सुधारणा झाली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिके पुन्हा पिवळी पडण्याबरोबरच त्यांच्यावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण होत आहे. आपली पिके या वातावरणातून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करताना दिसत आहेत. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून, शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज करताना अडचणी येत आहेत. उत्पादनापेक्षा फवारणीचा खर्च वाढल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शेतकयांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले होते. मात्र, तरीही चांगल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये रब्बी हंगामातील पिके घेण्याचा उत्साह होता. पण ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार का? अशी भीती शेतकयांना लागून राहिली आहे.


अजून बातम्या वाचा..

.