मनमाड : – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेण व दगडे अंगावर झेलले त्यामुळे आजची महिला सर्व क्षेत्रात प्रगती करू शकली आहे.सावित्रीबाईंचे समस्त स्त्रियांवर थोर उपकार आहे.शिक्षण घेऊन मोठ्या झालेल्या सावित्रीच्या लेकींनी समाजातील उपेक्षित मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करून त्यांना प्रवाहात आणले तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना अभिवादन ठरले. असे प्रतिपादन सौ.आम्रपाली वाघ यांनी केले.
मुरलीधर नगर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंतीनिमित्त महिला मंडळाच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी सौ. वाघ बोलत होत्या. जेष्ठ सदस्या सौ.आशा शार्दुल , सौ. केदारे , सौ. धोंडवड ,सौ.झालटे , सौ. शोभा बुरकुल , श्रीमती आशा ठाकरे , सौ.ललीता जाधव , सौ.गोसावी, श्रीमती शोभा उगले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ.रेश्मा पगारे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला तर परम जाधव या चिमुकल्यानेही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण करून उपस्थितांची दाद मिळविली.

या प्रसंगी मोनिका शार्दुल,सुरेखा शार्दुल,आशा केदारे,सपना ठाकरे ,जया शिंदे , सुनीता सोनवणे , जया कोल्हे , मनीषा शार्दूल , पुनम म्हस्के , मिना चांगटे , दिपा आहेर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












