भालूर (वार्ताहर) येथे पौष्टिक तृण धान्य विकास कार्यक्रम २०२३ अंतर्गत बाजरी पिक प्रात्यक्षिक बाबत तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी बाजरी या पिकाचे महत्व आणि बाजारपेठेतील स्थान यावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.तो स्वतः बरोबर जगाचेही पोषण करतो त्यामुळे त्याला स्वतःसाठी आणि जगाची भूक भागविण्यासाठी पौष्टिक अन्न मिळावे. सर्वांचा सुदृढ शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा यासाठी सरकारच्या वतीने पौष्टिक तृण धान्य विकास कार्यक्रम २०२३ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजरी पिकाचे उत्पादन घेऊन आपल्या आहारात बाजरी,ज्वारी यांचा नियमित समावेश करावा.ज्यामुळे मधुमेह,उच्च रक्तदाब,या आजारांवर तसेच कुपोषण कमी करण्यासाठी,गर्भवती महिलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले.यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजरी पिकाच्या बियाण्याचे आणि औषधांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच अर्चना निकम,विक्रम निकम,श्रावण गोरे,राजेंद्र मेंगळ, गणपत निकम,नंदू ईल्हे,शिवाजी ढगे, देविदास निकम,अप्पासाहेब मडके, दत्ता पाबळे,विनायक लहिरे,साईनाथ निकम,कमलेश काळे, मंडळ अधिकारी ई.एम. अंभोरे,पर्यवेक्षक एस.एन.पवार, कृषी सहाय्यक व्ही.एस. तवले,आर.डी.जैन आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना
पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेंतर्गत ३५ टक्के अनुदान असून जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देय आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी,महिला बचत गट, बेरोजगार युवकांनी या योजनेचा फायदा घेऊन प्रक्रिया उद्योग उभारावेत कृषी विभागाकडून सदर योजनेसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल.—–जगदीश पाटील तालुका कृषी अधिकारी.
फोटो: बाजरी बियाण्याचे वाटप करताना तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील,समवेत सरपंच अर्चना निकम आणि उपस्थित शेतकरी












