मनमाड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष योगेश ( बबलू ) पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्याकडे त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मनमाड नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर याचा कितपत परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान पाटील यापुढे कोणता राजकीय निर्णय घेतील या संबंधी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात असले तरी त्यांची व नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची वाढलेली जवळीक बघता पाटील हे सोमवारी मनमाड येथे होणाऱ्या करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या दिवशी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षातून अजून कोण कोण राजीनामा देऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतो हे आता सोमवारीच कळेल.
मनमाडचे माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील यांचे ते चिरंजीव तर राष्ट्रवादीचे नगर पालिका गटनेते कैलास पाटील यांचे ते पुतणे आहेत.








