मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा आशयाचे निवेदन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असतो. लोकशाहीच्या सरंक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेची कायमच महत्वाची भुमिका राहिलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरात हुकूमशाही प्रवृत्ती या पत्रकारितेवर अंकुश ठेवू पहात आहेत.पत्रकारांवरील हल्ले आणि दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू मांडतांना जनहिताला सतत प्राधान्य देणे हे पत्रकार आणि पत्रकारितेचे कर्तव्यच आहे. अशीच पत्रकारिता करणारे राजापूर (ता. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. विरोधात बातमी दिली या रागातून शशिकांत वारिके यांना संपविण्यात आले आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेवर केलेला हल्लाच असून आम्ही सारे पत्रकार याचा तीव्र निषेध करीत आहोत.देशातील लोकशाहीचा गळा घोटणारा हा प्रकार असून या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि शशिकांत वारिके यांना न्याय मिळावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. जेणेकरून अशा घटनांना भविष्यात पायबंद बसेल. पत्रकारांच्या जीवीताचे आणि पर्यायाने पत्रकारितेचे संरक्षण व्हावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, निलेश वाघ, अशोक बिदरी, नरहरी उंबरे, सतीश शेकदार, उपाली परदेशी, योगेश मस्के, गणेश केदारे, नाना आहिरे, अफरोज अत्तार, तुषार गोयल, आनंद बोथरा, अनिस शेख आदींनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.












