महावितरण कंपनीच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभारा विरोधात मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, संतोष बळीद, उप जिल्हा प्रमुख, संतोष जगताप, तालुका संघटक तसेच शहरप्रमुख माधव शेलार यांनी दिला आहे.
महावितरण कंपनीने त्यांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी प्रायव्हेट ठेकेदार नेमले मात्र कंपनीने प्रायव्हेट ठेकेदारांकडून वेळोवेळी योग्य तो मेन्टेनन्स करून न घेतल्यामुळे झाडांची कापणी न केल्यामुळे, वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या राज्यभर १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत मात्र रात्रभर वीजपुरवठा खंडीत असल्याने विद्यार्थी व पालकांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यभर व शहरात वातावरण बदलामुळे घरोघरी व्हायरल इन्फेक्शनमुळे लहान मुले व वयोवृध्द नागरिक आजारी आहेत अशी गंभीर परिस्थिती असतांनाही दिवसाला ४ तास ते ४८ तासापर्यंत वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे फोनही नेहमी बंदच असतात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन स्विचऑफ असतात. मात्र वीजबिल भरण्याबाबात महावितरणचे मेसेज मात्र न चुकता येतात, महावितरण कंपनीला खंडीत वीजपुरवठ्याचा फॉल्ट ४८ तास काम करुनही सापडत नाही मात्र सामान्य वीजग्राहकाचे १ महिन्याचे बिल थकले की त्यांचे घर मात्र लगेच सापडते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी खंडीत विजपुरवठ्याबाबत कोणाकडे चौकशी करायची, तसेच कोणाशी चर्चा करायची अशा प्रश्न संतप्त नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. तसेच महावितरण कंपनीतर्फे सोशल मिडीयावर ४ तासाने लाईट येतील काम सुरु आहे असे खोटे मेसेज पसरवून सामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
महावितरण कंपनीने त्यांच्या बेजबाबदार व ढिसाळ कामात तात्काळ सुधारणा न केल्यास शहरातील सर्व वीजग्राहकांना सोबत घेवून महावितरण कंपनीच्या विरोधात ज्वलंत असे आंदोलन छेडण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महावितरण कंपनी प्रशासन जबाबदार याची नोंद घ्यावी अशा तीव्र इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला आहे .













