मनमाड : (योगेश म्हस्के) चला पंढरीला जाऊ….विठ्ठल डोळा भरून पाहू , वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा (दिंडी) होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे .
वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत आहे . वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे . त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.
मनमाड येथुन देखील आषाढीवारी निमित्ताने गेल्या 43 वर्षांपासून मनमाड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. श्री संत कैकाडी महाराज , हभप कोंडीराम काका , हभप रामदास महाराज , या महान संतांच्या पालखी सोहळ्याचे हभप भारत महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले आहे. साधारण 23 दिवस मनमाड शहर आणि परिसरातील शेकडो वारकरी पायी चालून अखंड भजन , कीर्तन , टाळ-मृदुंगाच्या गजर करत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारीला पोहचणार आहे.आज सायंकाळी श्री दत्त मंदिर येथुन पालखी रथाचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून दिंडी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले , यावेळी शहर आणि परिसरातील भाविक मोठया संख्येने या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.











